नेपाळमधील महापुराचा बिहारला धोका; गंडक नदीकाठच्या सहा जिल्ह्यांना हाय अलर्ट

नेपाळ: २७ ऑगस्ट ; नेपाळमधील मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुराने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला असून, या पुराचा परिणाम बिहारमध्येही होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नेपाळच्या रसुवा परिसरात बुधवारी अचानक आलेल्या पुरामुळे मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे. पुरात अनेक जण बेपत्ता असून, विविध अहवालांनुसार मृतांचा आकडा १५७ पर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. शेकडो नागरिकांचा शोध सुरू आहे.
या दुर्घटनेत नेपाळसह २५ देशांतील नागरिक प्रभावित झाल्याचे सांगितले जात असून, त्यामध्ये १३३ भारतीय बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. हे नागरिक कैलाश मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. नेपाळचे परराष्ट्रमंत्री शिशिर खनाल यांच्या माहितीनुसार, विविध भागांत कार्यरत असलेले ८० सुरक्षा कर्मचारीही बेपत्ता असून त्यात ४४ नेपाळ आर्मी जवानांचा समावेश आहे.
पुराचा सर्वाधिक फटका रसुवा आणि धादिंगसह नुवाकोट, चितवन, गोरखा, तनहुँ आणि नवलपरासी परिसराला बसला आहे. अचानक आलेल्या पुरामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याची संधीही मिळाली नाही. पाणी आणि चिखलाच्या प्रवाहाने घरे, वाहने, रस्ते आणि सरकारी यंत्रणांचे मोठे नुकसान झाले आहे.
पुरामुळे नेपाळमधील ९ जलविद्युत प्रकल्प आणि १९ मोटरेबल पूल बाधित किंवा उद्ध्वस्त झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच नेपाळ-चीनला जोडणारा सुमारे ४२ किलोमीटर लांबीचा बेट्रावती-रसुवागढी महामार्गही पुराच्या तडाख्यात वाहून गेला आहे. चीन सीमेजवळील कस्टम चेकपोस्ट परिसरात अनेक वाहने व ट्रक पुराच्या पाण्यात अडकले आहेत.
दरम्यान, नेपाळमधून येणाऱ्या पाण्यामुळे बिहारमधील गंडक नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, गोपालगंज, सारण, मुजफ्फरपूर आणि वैशाली या सहा जिल्ह्यांमध्ये विशेष सतर्कता वाढवण्यात आली आहे. सीतामढी आणि शिवहरसह इतर संवेदनशील भागांवरही प्रशासनाची नजर आहे.
२७ ऑगस्ट रोजी नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गंडक नदीची पाणीपातळी, नेपाळमधून येणारा पाण्याचा प्रवाह आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतले जाणार आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना नदीकाठापासून दूर राहण्याचे आणि आपत्कालीन सूचना पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
