आषाढी एकादशी : मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मानाचा वारकरी सन्मान.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा भक्तिभावात पार पडली. यंदा धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील शेतकरी दाम्पत्य बाबासाहेब माधव माने आणि प्रभावती माने यांना ‘मानाचा वारकरी’ म्हणून गौरविण्यात आले.
महापूजेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते माने दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला तसेच एसटी महामंडळाकडून त्यांना वर्षभर मोफत प्रवासाचा पास प्रदान करण्यात आला. यंदाच्या आषाढी यात्रेसाठी देशभरातून 30 लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले असून विठ्ठलनामाच्या गजराने पंढरी भक्तिमय झाली आहे.
यावेळी पाणी, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, प्लास्टिकमुक्त वारी आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश देणाऱ्या दिंड्यांना ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.