असम आणि गुजरातमध्ये पुराचा कहर; जीव वाचवण्यासाठी सैन्याची मदत.
नवी दिल्ली : असम आणि गुजरातमध्ये पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. असममध्ये सततच्या पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. या आपत्तीत आतापर्यंत 47 जणांचा मृत्यू झाला असून 40 जण बेपत्ता असल्याची माहिती आहे.
राज्यातील 25 जिल्ह्यांतील 10.63 लाखांहून अधिक नागरिक पुरामुळे प्रभावित झाले आहेत.
दरम्यान, गुजरातमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून 50 हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
पुरग्रस्त भागांमध्ये प्रशासनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून मुंबईकडे जाणाऱ्या काही रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. मदत आणि बचाव कार्यासाठी दोन्ही राज्यांमध्ये सैन्याची मदत घेण्यात आली आहे.