नवी दिल्ली : फ्लाइट ड्यूटी टाइम लिमिटेशन (FDTL) नियमांमुळे निर्माण झालेल्या इंडिगोच्या संकटानंतर भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात अनुभवी पायलटांची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर देशातील दोन प्रमुख एअरलाईन्स — इंडिगो आणि एअर इंडिया ग्रुप — यांच्यात पायलट भरतीसाठी जोरदार चढाओढ सुरू झाली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, कडक सुरक्षा नियम, वाढलेली कार्यमर्यादा आणि थकवा नियंत्रणाचे निकष यामुळे अनेक अनुभवी पायलट सेवा सोडत आहेत किंवा इतर पर्यायांकडे वळत आहेत. परिणामी, एअरलाईन्सना पायलट उपलब्ध करून घेणे मोठे आव्हान ठरत आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, कॅप्टन पायलटांना आकर्षित करण्यासाठी ५० ते ५० लाख रुपयांपर्यंत साइनिंग बोनस देण्यात येत असतानाही कर्मचारी टिकवणे कठीण जात आहे.
विशेषतः इंडिगोला अलीकडेच उड्डाण रद्द, वेळापत्रकात बदल आणि मनुष्यबळ व्यवस्थापनातील अडचणींचा सामना करावा लागला. यानंतर इंडिगोने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला (DGCA) आश्वासन दिले असून, भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी भरती प्रक्रिया वेगाने राबवली जाईल. याचाच भाग म्हणून जानेवारी महिन्यातच सुमारे १०० नवीन पायलटांची भरती करण्याचा इंडिगोचा मानस आहे.
दुसरीकडे, एअर इंडिया ग्रुप देखील आपला ताफा आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे वाढवत असल्याने अनुभवी कॅप्टन आणि फर्स्ट ऑफिसर्सची गरज मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे दोन्ही एअरलाईन्समध्ये उच्च वेतन, आकर्षक बोनस, जलद प्रमोशन आणि चांगल्या रोस्टरच्या ऑफर्स देऊन पायलटांना आकर्षित करण्याची स्पर्धा सुरू आहे.
तज्ज्ञांच्या मते, भारतीय विमान वाहतूक क्षेत्र वेगाने वाढत असताना प्रशिक्षित आणि अनुभवी पायलटांची कमतरता ही दीर्घकालीन समस्या ठरू शकते. त्यामुळे केवळ तात्पुरत्या बोनसपेक्षा कामकाजाच्या अटी, विश्रांतीचा कालावधी आणि करिअर स्थैर्य यावर लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.