अरबी समुद्रात निर्माण झालेलं या हंगामातील पहिलं चक्रीवादळ ‘शक्ती’ (Cyclone Shakthi) आता अधिक तीव्र होऊ लागलं आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, हे वादळ गुजरातच्या द्वारका किनाऱ्याकडे सरकत आहे, आणि पुढील काही तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हे चक्रीवादळ मॉन्सूननंतरच्या काळातील पहिलं मोठं वादळ असून, श्रीलंकेने याला ‘शक्ती’ हे नाव दिलं आहे. हवामान खात्याने सांगितलं की, सध्या हे वादळ द्वारका किनाऱ्यापासून सुमारे 300 कि.मी. अंतरावर असून, त्याचा अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागांवर होऊ शकतो.
मुंबई आणि कोकणासाठी पावसाचा इशारा ‘शक्ती’ चक्रीवादळाचा मार्ग मुंबईकडे वळण्याची शक्यता कमी असली, तरी त्याचा परिणाम मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांवर होणार असल्याचं IMDने सांगितलं आहे. या भागांमध्ये जोरदार वारे (45–55 किमी/ता, झोत 65 किमी/ता पर्यंत) आणि अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
समुद्र खवळणार, मच्छीमारांना इशारा समुद्रात उंच लाटा आणि वादळी वाऱ्यांची शक्यता असल्याने, मच्छीमारांना किनाऱ्यापासून दूर न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन विभागाने किनारपट्टी भागातील जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.
हवामान खात्याचे स्पष्टीकरण: सध्या ‘शक्ती’ चक्रीवादळाचा मार्ग मुंबई किंवा महाराष्ट्रावरून जाणार नाही, मात्र त्याचे बाह्य परिणाम पावसाच्या स्वरूपात जाणवतील. काही सोशल मीडियावरील पोस्ट्समुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी, IMDने नागरिकांना अफवा टाळण्याचे आवाहन केले आहे.
प्रशासनाची तयारी: मुंबई महापालिका आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) सतर्क ठेवण्यात आले आहेत. पाण्याचा निचरा करणाऱ्या नाल्यांची साफसफाई, किनाऱ्यांवर गस्त, आणि सागरी भागात आपत्कालीन मदत पथके तैनात करण्यात आली आहेत.