२०२५ मध्ये परदेशातून भारतीयांच्या निर्वासनाबाबत समोर आलेली आकडेवारी धक्कादायक ठरली आहे. अनेकदा अमेरिका सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढते, अशी सर्वसाधारण धारणा असते. मात्र राज्यसभेत सादर करण्यात आलेल्या परराष्ट्र मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांचे निर्वासन अमेरिकेतून नव्हे तर सौदी अरेबियातून झाले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २०२५ मध्ये एकूण ८१ देशांतून २४,६०० हून अधिक भारतीय नागरिकांना निर्वासित करण्यात आले. यामध्ये एकट्या सौदी अरेबियातून तब्बल ११,००० पेक्षा अधिक भारतीयांना देशाबाहेर पाठवण्यात आले, ही बाब विशेष लक्षवेधी ठरली आहे. ही संख्या एकूण निर्वासनाच्या जवळपास निम्म्याहून अधिक आहे.
मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, विशेषतः खाडी देशांमधून होणाऱ्या निर्वासनामागची कारणे प्रामुख्याने कायदेशीर स्वरूपाची आहेत. यामध्ये व्हिसा किंवा निवास परवान्याची मुदत संपल्यानंतरही देशात राहणे, वैध वर्क परमिटशिवाय काम करणे, स्थानिक श्रम कायद्यांचे उल्लंघन, नियोक्त्यांकडून पळ काढणे, तसेच दिवाणी किंवा फौजदारी प्रकरणांत अडकणे अशा कारणांचा समावेश आहे.
अधिकाऱ्यांच्या मते, खाडी देशांतील स्थलांतर नियम अधिक कठोर झाल्यामुळे आणि तपास यंत्रणा सक्रिय झाल्यामुळे अशा कारवायांमध्ये वाढ झाली आहे. सौदी अरेबियाने गेल्या काही वर्षांत ‘लोकलायझेशन’ धोरण आणि कामगार नियम अधिक कडक केल्याने बेकायदेशीररित्या राहणाऱ्या किंवा काम करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर, परराष्ट्र मंत्रालयाने परदेशात जाणाऱ्या भारतीय नागरिकांना स्थानिक कायदे, व्हिसा अटी आणि कामगार नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. योग्य कागदपत्रे, वैध परवाने आणि नियमबद्ध राहणीमान ठेवल्यास अशा कठोर कारवायांपासून वाचता येऊ शकते, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
तज्ज्ञांच्या मते, ही आकडेवारी भारतासाठी एक इशाराच असून, परदेशात काम करणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी आणि कायदेशीर सल्ल्यासाठी अधिक मजबूत यंत्रणा उभारण्याची गरज अधोरेखित करते.